नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिल्लीत कोणतेही विकासकाम केलेले नाही. अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ४३ मिनिटांच्या भाषणातील ३९ मिनिटे ‘आप’ सरकारवर आरोप करण्यात घालवावी लागली नसती. असे प्रत्युत्तर अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी दिले. पंतप्रधान मोदी यांनी ‘शीशमहल’वर केलेल्या टीकेवरही केजरीवालांनी पलटवार केला. केजरीवाल म्हणाले की, २ हजार ७०० कोटी रुपयांच्या घरात राहणाऱ्या, ८ हजार ४०० कोटी रुपयांच्या विमानात प्रवास करणाऱ्या आणि १० लाख रुपये किमतीचा सूट घालणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून शीशमहलची गोष्ट चांगली वाटत नाही.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, १० वर्षांत आम आदमी पक्षाच्या सरकारने काय काय कामे केली? हे सांगायला सुरुवात केली तर २ ते ३ तासही कमी पडतील. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने एकही काम केली नाही. भारतीय जनता पक्ष (भाजप) फक्त निंदनीय राजकारण आणि वैयक्तिक आरोप करत असल्याचे केजरीवाल म्हणाले. भाजपने २०२० ते २०२५ पर्यंत केवळ ४ हजार ७०० लोकांना घरे दिले आहेत. दिल्लीत ४ लाख झोपड्या असून १५ लाख लोकांना घरांची गरज आहे. ज्यापद्धतीने घरे दिले जात आहेत. त्यानुसार सर्व झोपडीतल्या लोकांना घरे मिळायला आणखी २०० वर्ष लागतील, असा खोचक टोला केजरीवालांना लगावला.