नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने शिवजयंतीनिमित्त राज्यभर 12 ते 19 फेब्रुवारीदरम्यान स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडियापासून या कार्यक्रमाची सुरुवात आणि किल्ले रायगडावर याचा समारोप होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत बोलताना दिली.
स्वराज्य सप्ताहाच्या उद्घाटनाला पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित असणार आहेत; तर समारोपीय कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते राज्याच्या विविध भागांत सहभागी होणार आहेत, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.