नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे. शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन जवळ येत असताना या चर्चा आणखीच जोर धरू लागल्या. या पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे समजते. यासाठी ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सर्व खासदारांशी संपर्क करत असून त्यांच्याशी संवाद साधत असल्याचेही समजते.
ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. मात्र ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ नये यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील पहिल्या फळीतील नेते पक्षाच्या सर्व खासदारांशी संपर्क साधत आहे. प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. या चर्चेतून पुढे येणारी खासदारांची मते पक्ष नेतृत्वाला कळवली जाणार आहेत.
ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोर धरत असताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे स्वतः देखील खासदारांसोबत संपर्क साधत आहेत. त्यांच्याशी चर्चा करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीत आहेत. सोबतच अरविंद सावंत, राजाभाऊ वाझे हे देखील मंगळवारी दिल्लीत झाले आहेत. या सर्व नेत्यांना निमित्त संसदेच्या विविध समित्यांच्या बैठकीचे आहे. मात्र ज्या राजकीय पार्श्वभूमीवर हे नेते दिल्लीत आहेत त्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.
ऑपरेशन टायगर अंतर्गत जे खासदार जाऊ शकतात त्यांनी मंत्रिपद मागितल्याची देखील चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटणाऱ्या गटाला मंत्रिपद देण्याचा शब्द दिल्याची चर्चा देखील आहे. मात्र मंत्री कोण होणार, यावर फुटणाऱ्या गटात रस्सीखेच असल्याचे समजते.