Odisha crime news
ओडिशा: विभक्त झालेली पत्नी परत यावी यासाठी अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या भयानक प्रकारातून एका ४० वर्षीय व्यक्तीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ओडिशातील बोलांगिर जिल्ह्यातील बगदा गावात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शत्रूघ्न साहू (रा. बगदा) या मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे. संतोष खारसेल (रा. तेबादमुंडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी शत्रूघ्न साहू याने संतोष याला जेवणाच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले होते. संतोष रात्री झोपी गेल्यानंतर आरोपी साहू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याचा शिरच्छेद केला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे धड गावाबाहेरील एका तलावात फेकून दिले, तर कापलेले शिर साहू याने आपल्या घरातील देवघरात लपवून ठेवले होते. गुरुवारी स्थानिकांना तलावात मुंडके नसलेला मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
तपासादरम्यान संतोषला शेवटचे शत्रूघ्न साहू याच्यासोबत पाहिल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलीस साहूच्या घरी पोहोचले असता तो घरात ध्यान करत बसला होता. सुरुवातीला दारूच्या वादातून हत्या केल्याचे त्याने सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पूजेच्या घरात लपवलेले कापलेले शिर दाखवले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले धारदार शस्त्र आणि कापलेले शिर जप्त केले आहे.
गेल्या १० वर्षांपासून साहूची पत्नी मुलांसह त्याच्यापासून वेगळी राहत होती. त्याच्या अंधश्रद्धाळू वृत्तीमुळे आणि जादूटोण्याच्या सवयींमुळेच ती त्याला सोडून गेल्याचा संशय आहे. 'मांत्रिक उपायाने विभक्त झालेली पत्नी पुन्हा परत येईल' या अंधश्रद्धेतूनच आपण संतोषचा नरबळी दिल्याची कबुली मुख्य आरोपी साहू याने पोलिसांसमोर दिली आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपी शत्रूघ्न साहू, त्याची आई, भाऊ आणि भावजय यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.