नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 25 ते 28 रुपयांची वाढ होणार नसून, याबाबतचे वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने गुरुवारी दिले.
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव 100 डॉलर प्रतिबॅरलवर गेले आहेत. दीर्घकाळ कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलरपार राहिल्याने भाववाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पश्चिम बंगालसह काही राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर भाववाढ केली जाईल, असे वृत्त माध्यमांनी दिले. नागरिकांमध्ये भीती पसरविण्यासाठी असे वृत्त दिले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
भारत गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. आकडेवारीनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये भारताने कच्च्या तेलाची आयात 12 ते 15 टक्क्यांनी कमी केली असूनही वाढलेल्या किमतींमुळे भारताचे आयात बिल दररोज 190 ते 210 दशलक्ष डॉलर्सनी वाढले आहे.