नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन सोहळ्याची देशभर जय्यत तयारी सुरू असताना दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उघड केला आहे. दहशतवाद्यांनी ‘26-26’ हा नवा कोड वर्ड वापरला असल्याचे लक्षात आल्यानंतर नवी दिल्लीसह काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुप्तचरांच्या माहितीनुसार, दिल्लीसह देशातील महत्त्वाची ठिकाणे, तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. त्याद़ृष्टीने ते कट रचत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ यांनी एकत्रितपणे भारतात दहशत निर्माण करण्यासाठी एक धोकादायक योजना (ऑपरेशन 26-26) रचली आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या कटाचा उद्देश प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात घातपात घडवून आणणे हा आहे. दहशतवाद्यांनी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला प्राथमिक लक्ष्य बनवण्याचा कट रचला आहे. दिल्ली पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांची पोस्टर्स जारी केली आहेत.