पुढारी ऑनलाईन डेस्क: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.१५) रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी हजारो भाविकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली, या वेळी ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेबाबात आपत्ती व्यवस्थापनाला कॉल करण्यास ४० मिनिटे उशीर झाल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तयार केलेल्या अहवालानुसार, रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेनंतर आपत्कालीन कॉल करण्यास ४० मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाला. रेल्वेने त्यांच्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, रात्री ९.१५ वाजता चेंगराचेंगरी झाली. दिल्ली अग्निशमन सेवांनी सांगितले की त्यांना दिल्ली पोलिसांकडून पहिला कॉल रात्री ९.५५ वाजता आला, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
परंतु इंडिया टुडे टीव्हीने दिलेल्या आरपीएफच्या वृत्तानुसार, चेंगराचेंगरी रात्री ८.४८ वाजता झाली आणि त्याची माहिती ड्युटीवर असलेल्या स्टेशन प्रभारींना देण्यात आली, असे देखील वृत्तात म्हटले आहे.