राष्ट्रीय

Nepal Flood : नेपाळमधील महाप्रलय! २८८ भारतीयांशी संपर्क तुटला; २१ जणांची सुटका, तर २०० जण तिबेटमध्ये अडकले

नेपाळमधील पुराबाबत परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, तिबेट सीमेवर अडकलेल्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडवर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे किमान २७० लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, २८८ हून अधिक भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही; तसेच मंत्रालयाने सुटका करण्यात आलेल्या नागरिकांविषयीही माहिती दिली.

प्राथमिक माहितीचा हवाला देत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, संपर्क तुटलेल्या २८८ भारतीय नागरिकांमध्ये 'त्रिशुली १' ऊर्जा प्रकल्पावर काम करणारे ७३ लोक; तसेच 'सम्राट' आणि 'फ्लाय एव्हरेस्ट ट्रॅव्हल्स'द्वारे अमरनाथ यात्रेसाठी गेलेले तमिळनाडूतील ३७ आणि ४९ नागरिकांचे दोन स्वतंत्र गट यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, 'सम्राट ट्रॅव्हल्स'च्या मदतीने रसुवा जिल्ह्यात गेलेला पश्चिम बंगालमधील ३२ नागरिकांचा गट; 'रिचा टूर्स'द्वारे गेलेला विविध राज्यांतील ६१ भारतीय नागरिकांचा गट आणि केरळमधील ३३ भारतीय नागरिकांचा गट यांच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही.

सुटकेच्या प्रयत्नांबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की, तमिळनाडूतील २१ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेसाठी गेलेले काही भारतीय नागरिक सध्या चीनच्या हद्दीत अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बीजिंगमधील भारतीय दूतावास प्रयत्न तीव्र करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी माहिती दिली की, किमान २०० भारतीय नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे; त्यापैकी ९५ जण 'दारचेन' येथे असून ते सध्या नेपाळच्या दिशेने येत आहेत. जयस्वाल यांनी माहिती दिली की, 'ईशा फाउंडेशन'चे सदस्य - ज्यामध्ये भारतीय वंशाचे लोक, परदेशी नागरिक आणि इतर भारतीय नागरिकांचा समावेश आहे - ते नेपाळमध्ये अडकले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

दोन विमाने मदत सामग्री घेऊन नेपाळला पोहोचली

भारताकडून नेपाळला पुरवण्यात आलेल्या मदतीबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की, मदत घेऊन जाणारी दोन विमाने काठमांडूला पाठवण्यात आली आहेत. त्यांनी सांगितले की, २६ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० च्या सुमारास १० टन मदतसामग्री घेऊन 'सी-१३० जे' हे विमान पाठवण्यात आले होते. या मदतसामग्रीमध्ये तात्पुरते निवारे, ब्लँकेट्स, स्वच्छता किट्स, सौर दिवे, औषधे इत्यादींचा समावेश होता.

गुरुवारी सकाळी आणखी एक सी - १८ विमान ३७.५ टन मदत आणि आपत्ती निवारण साहित्य, औषधे आणि अन्नाची पाकिटे घेऊन रवाना करण्यात आले. नेपाळमधील पूर-मदत आणि बचाव कार्याला सहकार्य करण्यासाठी हा साठा नेपाळचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम मंत्री महाबीर पुन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने 'एक्स' वरील एका पोस्टद्वारे स्पष्ट केले. जयस्वाल यांनी भारताचा पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित केला आणि सांगितले की, या कठीण काळात भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT