NEET UG paper leak case
नवी दिल्ली: NEET UG-२०२६ परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी पाच आरोपींना अटक केली असून देशभरात अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या उच्च शिक्षण विभागाने ३ मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीबाबत लेखी तक्रार दिल्यानंतर, मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीबीआयच्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) कायदा २०२४ च्या अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि विश्वासघात यांसारख्या विविध कलमान्वये एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी या पेपरफुटीचे धागेदोरे जयपूरमधील एका प्रिंटिंग एजन्सी आणि राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा, बिहार व केरळमधील कोचिंग नेटवर्क्सशी जोडले आहेत. अधिकार्यांच्या मते, पेपरफुटीचे साहित्य ४१० प्रश्नांच्या एका पीडीएफ (PDF) स्वरूपात फिरत होते. त्यापैकी सुमारे १४० प्रश्न (ज्यात केमिस्ट्रीचे १२० प्रश्न होते) मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचा संशय आहे.आतापर्यंत सीबीआयने पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये जयपूरमधील ३, गुरुग्राम १ आणि नाशिकमधील एका संशयित आरोपीचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून इतर अनेक संशयितांची चौकशी केली जात आहे.
पेपरफुटी आणि परीक्षा साहित्याच्या प्रसाराशी संबंधित मोठे जाळे शोधण्यासाठी तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट-युजी २०२६ परीक्षा रद्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वीच काही प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयामुळे सुमारे २३ लाख उमेदवारांवर परिणाम झाला आहे. २०१९ मध्ये एनटीएकडे या परीक्षेची जबाबदारी आल्यानंतर संपूर्ण नीट-युजी परीक्षा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह म्हणाले, "संपूर्ण पेपर फुटला असे मी म्हणणार नाही. परंतु, आमच्या प्रश्नपत्रिकेतील एक जरी प्रश्न जुळला, तरी आमच्या 'झिरो टॉलरन्स' आणि 'झिरो एरर' धोरणाचे उल्लंघन होते आणि संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते."
एनटीएने स्पष्ट केले आहे की, NEET-UG परीक्षा पुन्हा घेतली जाईल, ज्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची किंवा नवीन शुल्क भरण्याची गरज नाही. जुन्याच परीक्षा केंद्रांच्या पर्यायांचा विचार केला जाईल.