नवी दिल्ली: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागलेल्या 'नीट' परीक्षेबाबत केंद्र सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ३ मे २०२६ रोजी झालेली 'नीट' परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय चाचणी संस्थेने (National Testing Agency) घेतला असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून परीक्षेतील गोंधळावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून यातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासादरम्यान 'एनटीए' सीबीआयला सर्व प्रकारचे सहकार्य, आवश्यक कागदपत्रे आणि रेकॉर्ड उपलब्ध करून देणार आहे. या चौकशीतून पेपरफुटीचे धागेदोरे कोठपर्यंत पोहोचले आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही
परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज केले होते, त्यांना नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले परीक्षा शुल्क त्यांना परत केले जाईल. फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. 'एनटीए' आपल्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून ही परीक्षा पुन्हा आयोजित करणार आहे.
लवकरच नवीन वेळापत्रक
फेरपरीक्षा नेमकी कधी होणार, याबाबतची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, 'एनटीए' लवकरच अधिकृत संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी 'एनटीए'च्या संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.