NEET Re Exam Controversy: नीटची पुन्हा घेतलेली परीक्षा रविवारी २१ मे रोजी संपन्न झाली. मात्र परीक्षेच्यावेळी होणारा गोंधळ सुरूच आहे. या परीक्षेदरम्यान एक सॉल्वर गँग अॅक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे. या गँगच्या २४ लोकांना पोलिसांनी बिहारमधील लखीसरायमध्ये अटक केली आहे. यात ५ मेडिकलचे विद्यार्थी देखील सामील आहेत. याचबरोबर परीक्षा प्रक्रियेवेळी बायोमेट्रिक व्यवस्था सांभाळणाऱ्या कंपनीच्या १४ कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सॉल्वर गँगने खऱ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऐवजी डमी सॉल्वर्स बसवण्याचा कट रचला होता. या संपूर्ण प्रकरणात अन्नपूर्णा नारायण मगध मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे विद्यार्थी अर्पित राज हा सॉल्वर गँगचा म्होरक्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. अर्पित राजने २०२४ नीट पेपर लीक प्रकरणात यापूर्वी सीबीआयने चौकशी केली होती.
पोलिसांनी सांगितलं की या संपूर्ण नेटवर्कचा भांडाफोड हा पीएमसीएचच्या तिसऱ्या वर्षाचा एमबीबीएसचा विद्यार्थी मयांक कश्यप बायोमेट्रिक कंपनीचा खोटा स्टाफ होऊन हसनपूर हाय स्कूल परीक्षा केंद्राच्या आत घुसला त्यावेळी झाले. पोलिसांच्या तपासणीवेळी सर्वात आधी या मयांकला पकडण्यात आलं. त्यानंतर चौकशीनंतर या टोळीतील इतर सदस्य असलेल्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
मयांकने दिलेल्या माहितीनंतर केआरके हायर सेकंडरी स्कूल आणि केंद्री यविद्यालय लखीसराय इथं छापेमारी करून तिथून ७ परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, या तपासावेळी या टोळीत मोठ्या मेडिकल कॉलेजमधील आणि नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. तपासात पीएचयू नर्सिंगची विद्यार्थिनी पूनम कुमारी दुसऱ्या विद्यार्थाची डमी परीक्षार्थी म्हणून बसल्याचं आढळून आलं. त्याचबरोबर एम्स रायबरेलीचा विद्यार्थी सौरभ झा दिल्लीच्या शाहदरा मेडिकल कॉलेजमधील इटर्न अमन ग्रवाल आणि एनएमसीएच नर्सिंगचे विद्यार्थी संजीत आणि त्याच्या भावाला देखील अटक करण्यात आली आहे.
नीट परीक्षेच्यावेळी मेडिकल विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या बाहेर ने जाण्याचे निर्देश होते. पीएमसीएचसह अनेक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थांना थांबवण्यासाठी सेमिनार आणि क्विजचे आयोजन करण्यात आले होते. मात्र असं असतानाही पीएससीएचचे अनेक विद्यार्थी या कार्यक्रमांतून गायब होते. पोलिसांच्या तपासात मयांक कश्यप हा आजाराचे कारण सांगून कॉलेजच्या बाहेर पडला होता. त्याला नंतर लखीसयारमधून अटक करण्यात आली.