नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील नीट परीक्षार्थी ऋतिक मिश्रा याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून व्यवस्थेकडून झालेली हत्या आहे, असे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले की, “आता स्पर्धा परीक्षा द्यावी लागणार नाही,” हे ऋतिक मिश्रा यांचे शेवटचे शब्द होते. तिसऱ्यांदा नीट परीक्षा देणारा हा विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या खचला होता. गोव्यातही एका नीट दिलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, ही मुले परीक्षेत हरली नाहीत, तर भ्रष्ट व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला आहे. ही आत्महत्या नसून व्यवस्थेकडून झालेली हत्या आहे.
राहुल गांधी यांनी दावा केला की, २०१५ ते २०२६ या काळात १४८ परीक्षा घोटाळे झाले. त्यापैकी ८७ परीक्षा रद्द झाल्या असून ९ कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला. १४८ घोटाळ्यांपैकी फक्त एकालाच शिक्षा झाली. सीबीआय आणि ईडी चौकशी करूनही कोणालाही शिक्षा झालेली नाही, तसेच नीट आणि इतर वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये १५ घोटाळे झाले. घोटाळे करणाऱ्यांना बक्षीस मिळते आणि परीक्षा देणारी मुले जीव गमावतात. पंतप्रधानांची जबाबदारी जागी होण्यासाठी अजून किती वर्षे लागणार?” असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनीही ऋतिक मिश्रा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. लखीमपूर खीरी येथील विद्यार्थी ऋतिक मिश्रा याच्या आत्महत्येची बातमी अत्यंत दु:खद आहे. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. परीक्षांमधील भ्रष्टाचारामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करत प्रियंका गांधी यांनी केला. “हे सगळं अखेर कधी थांबणार? जबाबदारी निश्चित कधी होणार?” असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.