नवी दिल्ली : जात, धर्म आणि लिंगभेद नसलेल्या समाजाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. दिल्लीतील 'लोकमाता अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार' समारंभात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, या पुरस्कार सोहळ्यात ४२ महिलांना सन्मानित करण्यात आले. दरवर्षी कमला अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्ट मुंबईद्वारे हे पुरस्कार दिले जातात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता जग बदलले आहे आणि महिलांना त्यांची प्रतिभा दाखवण्यात कोणत्याही प्रकारच्या मर्यादा जाणवू नयेत. आता ७५ टक्के महिला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आहेत, ज्यावरून हे सिद्ध होते की जिथे गुणवत्ता असते तिथे महिला आघाडीवर असतात.
या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष नितीन गडकरी होते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल, कामगार आणि रोजगार मंत्री तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनती श्रीनिवासन आणि खासदार मनोज तिवारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर महिला सक्षमीकरणाबद्दल बोलले आणि हरियाणामध्ये या दिशेने झालेल्या विकासाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेमुळे हरियाणामध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यात महिलांसाठी ३० पोलिस ठाणे तयार करण्यात आले होते, असे ते म्हणाले.