पाटणा; वृत्तसंस्था : बिहारमधील राज्यसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सोमवारी विजय मिळवत पाचही जागा जिंकल्या. मुख्यमंत्री आणि जदयुचे प्रमुख नितीश कुमार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत निवडून आले.
‘एनडीए’च्या अन्य विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री रामनाथ ठाकूर, राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि माजी आमदार शिवेश कुमार यांचा समावेश आहे. काँग्रेसचे तीन आमदार - सुरेंद्र प्रसाद कुशवाह (वाल्मीकीनगर), मनोज बिस्वास (फोर्ब्सगंज), मनोहर प्रसाद सिंह (मनिहारी) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केले नाही, तर ढाक्यातील आरजेडी आमदार फैसल रहमान यांनीही मतदानाला गैरहजर राहून महागठबंधनचे उमेदवार आणि प्रसिद्ध व्यापारी अमरेंद्र धारी सिंह यांच्या विजयाच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या.
‘एनडीए’च्या सर्व 202 आमदारांनी मतदान केले. याउलट, विरोधी पक्षांच्या 41 पैकी फक्त 37 आमदार मतदान करण्यासाठी उपस्थित राहिले. पाच जागांसाठी झालेल्या मतदानादरम्यान काँग्रेसचे तीन आणि राजदचा एक आमदार संपर्कात नव्हता. सर्व पाच विद्यमान खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे.
ओडिशात बावनकुळे यांची रणनीती यशस्वी; तिसरा उमेदवारही विजयी
ओडिशातील राज्यसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल, विद्यमान राज्यसभा सदस्य सुजित कुमार हे अधिकृत उमेदवार आणि भाजपने समर्थन दिलेले दिलीप राय हे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्राचे महसूलमंत्री आणि या निवडणुकीसाठी भाजपने नियुक्त केलेले केंद्रीय पर्यवेक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पक्षाने हे यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेचा आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा हा विजय आहे. सर्व आमदारांनी एकजुटीने व एकनिष्ठतेने मतदान केले. त्यामुळे हा विजय प्राप्त होऊ शकला, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली.