पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आघाडी एकतर्फी बाजी मारले, हा अंदाज आज सकाळी ११ वाजेपर्यंतच्या मतमोजणीत फोल ठरताना दिसत आहे. प्रारंभीच्या मतमोजणीत एनडीए आघाडीला इंडिया आघाडी जोरदार टक्कर देत असल्याचे चित्र आहे. सकाळी अकरापर्यंतच्या मतमोजणीत एनडीए २८९ जागांवर तर इंडिया २३१ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी २७ , महायुती २० तर अपक्ष १ जागांवर आघाडीवर आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत महाविकास आघाडीने महायुतीवर आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात सत्यजीत पाटील- सरुडकर, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, सातारामध्ये शशिकांत शिंदे, माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते-पाटील, शिरुरमध्ये अमोल कोल्हे, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत.
देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणार्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये समाजवादी पार्टीने मुसंडी मारली आहे. राज्यातील एकुण ८० जागांपैकी इंडिया आघाडी ४३ एनडीए ३६ तर अन्य १ जागांवर आघाडीवर आहे.
मतमोजणीमध्ये चढ-उताराचा नकारात्मक परिणाम देशातंर्गत शेअर बाजारवर उमटले. सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. व्यवहाराच्या सुरुवातीला तो 183 अंकांच्या घसरणीसह उघडला. लगेचच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला आणि 74,753 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीही 84 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि 539 अंकांपेक्षा अधिक घसरून 22,724.80 वर आला.
भारतीय निवडणूक आयोगाने बारा वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्ष (भाजप), लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) आणि जनता दल (संयुक्त) यांचा समावेश असलेली एनडीए आघाडी बिहारमध्ये आघाडीवर आहे.बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) 14 जागांवर आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्ष 11 जागांवर आघाडीवर आहे, असे भारतीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) 5 जागांवर, राष्ट्रीय जनता दल पाच जागांवर, काँग्रेस दोन जागांवर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1 जागेवर आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) 1 जागेवर आघाडीवर होते.
बिहारमध्ये इंडिया आघाडीचे राष्ट्रीय जनता दल २६ जागांवर, काँग्रेस ९ जागांवर आणि डाव्या पक्षांनी राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघांपैकी पाच जागांवर निवडणूक लढवली होती.
तेलंगणामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर हैदराबाद लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र आहे. राज्यातील ४१ मतदारसंघांपैकी 28 जागांवर तृणमूलने आघाडी घेतली आहे. भाजप १० तर काँग्रेस दोन्ही जागांवर आघाडीवर आहे. सीपीआयएम एका जागेवर आघाडीवर आहे.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघात ओमर अब्दुल्ला पिछाडीवर असून अपक्ष उमेदवार अब्दुल रशीद आघाडीवर आहेत.