नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्यात मंगळवारी विस्तृत चर्चा झाली. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत-कतार संबंधांना व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि लोकांमधील संबंधांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन्ही देशांमधील पारंपारिक संबंध आणखी मजबूत होतील. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील चर्चेदरम्यान इस्रायल आणि हमासच्या मुद्द्यावरही दोन्ही बाजूंनी आपले विचार व्यक्त करण्यात केले. यासह इतर जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, कतारच्या तुरुंगात कैद असलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. कतारच्या तुरुंगात ६०० भारतीय आहेत. २०२४ मध्ये ८५ भारतीयांना माफी मिळाली. कतारमध्ये राहणाऱ्या एका नौदल अधिकाऱ्याचा खटला अजूनही प्रलंबित आहे. मंगळवारी भारत आणि कतार यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी स्थापनेबाबतच्या कराराची देवाणघेवाण झाली.
रणधीर जयस्वाल म्हणाले की, "भारत आणि कतारमधील पारंपारिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांनी आज हैदराबाद हाऊस येथे व्यापक चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-कतार संबंधांना व्यापार, ऊर्जा, गुंतवणूक, नवोपक्रम, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा, संस्कृती आणि लोकांमधील संबंधांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली." या विशेष भारत- कतार भागीदारीत एक नवीन टप्पा गाठला जाणार आहे. हैदराबाद हाऊस येथे झालेल्या करारांच्या देवाणघेवाणीत, उत्पन्नावरील करांबाबत दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि वित्तीय चोरी रोखण्यासाठी भारत आणि कतार यांच्यातील सुधारित कराराची देवाणघेवाण करण्यात आली, असेही ते म्हणाले.