नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो २०२६ मध्ये विविध क्षेत्रातील एआय अनुप्रयोगांचे प्रदर्शन करणाऱ्या स्टार्टअप्स, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.
यापूर्वी 'एक्स'वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट समिटसाठी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आलेले जागतिक नेते, उद्योगजगतातील अग्रणी, धोरणकर्ते, संशोधक आणि जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तंज्ञांचे स्वागत केले. या परिषदेची संकल्पना "सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय - सर्वांच्या कल्याणासाठी एआय, सर्वांच्या आनंदासाठी एआय" अशी आहे. यातून मानवकेंद्रित प्रगती आणि सर्वसमावेश विकासाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याची भारताची वचनबद्धता दिसून येत, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, प्रशासन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनकारी भूमिकेला अधोरेखित केले. या परिषदेत होणाऱ्या विचारमंथनातून नवोन्मेष, सहयोग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार उपयोग याविषयीच्या जागतिक चर्चेत मोलाची भर पडेल आणि एका प्रगतिशील, नवोन्मेषी आणि संधींवर आधारित भविष्याला आकार मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनातील भारताचे नेतृत्त्व अधोरेखित करुन सांगितले की आपल्या १४० कोटी जनतेचे सामर्थ्य, मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा, चैतन्यशील स्टार्टअप परिसंस्था आणि अत्याधुनिक संशोधन यांच्या बळावर भारत हे नेतृत्व करत आहे, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेमधील भारताच्या प्रगतीमधून महत्त्वाकांक्षेबरोबरच जबाबदारीचे दर्शन घडते देशाला तंत्रज्ञानातील प्रगतीच्या अग्रस्थानी विराजमान करते, असे ते म्हणाले.