मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : उपराष्ट्रपतिपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी महाराष्ट्रातील 9 खासदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 2, तर काँग्रेसच्या एका खासदाराने ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातून 4 किंवा 5 मते फुटतील, असे गृहीत धरले जात होते. प्रत्यक्षात 9 खासदारांनी सत्ताधार्यांच्या बाजूने मतदान केले. विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी अंतरात्म्याला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले होते. हा आतला आवाज ऐकत महाराष्ट्रातल्या तब्बल 9 खासदारांनी रेड्डींऐवजी राधाकृष्णन यांना मत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला स्वत:ची मतेही राखता नाहीत, अशी टीका केली आहे. विरोधकांना मतदानासाठी गळाला लावण्याकामी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी व्यवस्थित व्यूहरचना केल्याचे सांगितले जात आहे.
आमची 15 मते फुटली, अशी कबुली काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात होते. या निवडणुकीत ‘एनडीए’ने नेमलेल्या तीन निरीक्षकांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश केला गेला होता. त्यांनी मते फुटल्याचा दावा केला आहे. त्यांना निरीक्षक नेमण्याचे कारण व्यूहरचनेकडे लक्ष देणे हे होते. शिवसेना ‘उबाठा’चे बृहन्मुंबई परिसरातील एक, विदर्भातील दोन, उत्तर महाराष्ट्र परिसरातील एक अशी चार मते फुटल्याचे सांगितले जाते. वास्तवात, हा आकडा वाढला आहे. मराठवाड्यातील दोन मते यात नंतर जमा झाल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे फुटलेले मत मुंबई परिसरातील असून, काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या जवळच्या खासदाराच्या अंतरात्म्याचा आवाज मोदीभक्तीचा झाला, अशी कहाणीही चर्चेत आहे. दिवाळीनंतर ‘उबाठा’चे आमदार फुटतील, असे शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी सांगितले होते. त्यामुळे खरेच 6 मते फुटली का, याबद्दल कुजबुज वाढली आहे. शिवसेना ‘उबाठा’ने हा अपप्रचार असल्याचे सांगत शिंदे सेनेवर बुद्धिभेदाचा आरोप केला आहे.