NEET Paper Leak Protest : नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून आता नरेंद्र मोदी सरकार स्वकीयांच्याच निशाण्यावर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी मानव संसाधन विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी जंतर-मंतरवर प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या बळप्रयोगाची तीव्र निंदा केली आहे. "सरकारने या आंदोलनाकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहू नये," असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
भाजपच्या 'मार्गदर्शक मंडळाचे' सदस्य असलेल्या मुरली मनोहर जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले, "देशाच्या विविध भागांतून आलेले तरुण विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून नवी दिल्लीच्या रस्त्यांवर जमा झाले आहेत, हे दृश्य अत्यंत वेदनादायी आहे. विद्यार्थ्यांच्या चिंता आणि मागण्या रास्त आहेत. त्याकडे सहानुभूतीने आणि दीर्घकालीन उपायांच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजे."
"मला पूर्ण आशा आहे की, या आंदोलनाकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेची समस्या म्हणून पाहिले जाणार नाही, जेणेकरून ते बळाचा वापर करून चिरडून टाकावे लागेल. मात्र, आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि तरुण विद्यार्थिनींवर ज्या प्रकारे अमानुष बळप्रयोग करण्यात आला, ते पाहून मला अत्यंत वेदना झाल्या आहेत," असेही मुरली मनोहर जोशी यांनी म्हटले आहे.
"अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्यामुळे भारतीय समाजाचा एक मोठा भाग 'विकसित भारत' या मुख्य ध्येयापासून खूप दूर फेकला जाईल," अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.