NCERT Books changes
नवी दिल्ली : मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व संदर्भ इयत्ता सातवीच्या एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून हटवण्यात आले आहेत. एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकाशित झालेले पुस्तक – 'एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियाँड' हे सुधारित अभ्यासक्रमाचा केवळ पहिला भाग आहे. तर दुसरा भाग आगामी महिन्यांत प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे. मात्र, वगळलेला मजकूर दुसऱ्या भागात समाविष्ट केला जाईल का, यावर अद्याप कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
सातवीच्या नवीन NCERT पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व उल्लेख काढून टाकण्यात आले आहेत. याऐवजी, भारतीय राजवंशांवरील प्रकरणे, 'पवित्र भूगोल' आणि इतर अनेक संदर्भ जोडले गेले आहेत. यामध्ये प्रयागराजचा महाकुंभमेळा आणि मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ, अटल बोगदा (टनल) सारख्या सरकारी योजनांचा नवीन इयत्ता सातवी NCERT च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या आठवड्यात प्रकाशित झालेली ही पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCFSE) २०२३ च्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहेत.
भारतीय नीतिमत्ता
"एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड" या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर नवीन प्रकरणे आहेत, ज्यात "भारतीय नीतिमत्ता"वर लक्ष केंद्रित केले आहे.
धार्मिक ठिकाणे आणि तीर्थक्षेत्रे
पुस्तकात आणखी एक नवीन भर म्हणजे "जमीन कशी पवित्र होते" हे प्रकरण आहे जे भारतात आणि बाहेर इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी आणि झोरोस्ट्रियन, हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म यासारख्या धर्मांसाठी पवित्र मानली जाणारी ठिकाणे आणि तीर्थस्थळांवर लक्ष केंद्रित करते.
भारताचा भूगोल
या प्रकरणात "पवित्र भूगोल" सारख्या संकल्पनांचा परिचय करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये १२ ज्योतिर्लिंगे, चार धाम यात्रा आणि "शक्तीपीठे" सारख्या ठिकाणांच्या जाळ्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. या प्रकरणात नद्यांचे संगम, पर्वत आणि जंगले यासारख्या पूजनीय ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे.
नवीन पुस्तकात 'जमीन कशी पवित्र होते' या शीर्षकाचा एक अध्याय जोडला आहे, जो भारत आणि परदेशातील इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी, पारशी, हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मांच्या तीर्थस्थळांची संकल्पना आणि भूगोल स्पष्ट करतो. त्यात १२ ज्योतिर्लिंगे, चार धाम यात्रा, शक्तीपीठे, नद्यांचे संगम, पर्वत आणि जंगले यासारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख आहे. पंडीत जवाहरलाल नेहरूंचे एक वाक्य देखील नमूद केले आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचे वर्णन तीर्थक्षेत्रांचा देश म्हणून केले आहे.