प्रयागराज : पुढारी ऑनलाईन
महाकुंभात पहिल्या ४ दिवसात ७ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर श्रद्धेची डुबकी घेत पवित्र स्नान केले. आज महाकुंभाच्या पांचव्या दिवशीही भक्तांचा अखंड ओघ सुरूच आहे. तर अनेक भाविकांनी संत महंतांच्या तंबुत जाउन त्यांचे आशिर्वाद घेतले आणि कथांचे श्रवण केले. महाकुंभ मध्ये भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या गर्दीला सनातन धर्मा प्रती लोकांची दृढ श्रद्धेचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. (Mahakumbh 2025)
फक्त भारतच नाही तर, जगभरातून मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात सहभागी होत आहेत. दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्गहून आलेल्या नरसिंह स्वामींनी सांगितले की, त्यांनी अनेक वर्षांपासून महाकुंभात सामिल होण्याचे स्वप्न पाहिले होते. आता त्यांना ही संधी मिळाली आहे. त्यांनी सांगितले की, मी खूप उत्साहित आहे. मी अनेक वर्षांपासून महाकुंभात येण्याचे ठरवले होते. मात्र यावेळी अखेन मला तो योग जुळून आला. मी स्वत:ला सांगितले मी महाकुंभात जात आहे आणि मी इथे पोहोचलो आहे. भक्ती नरसिंम्हा स्वामी यांच्या शिवाय महाकुंभात आणखी परदेशी पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षित केल्याचे दिसून येत आहे.
भक्तांसाठी महाकुंभात उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. भक्त इथल्या जेवणाच्या व्यवस्थेवरून देखील खूप समाधानी आहेत. सुरभी शोध संस्थान या समाजसेवी संस्थेकडून भक्तांसाठी फक्त नाश्त्याची व्यवस्था केलेली नाही तर त्यांच्या सेवेत अनेक कार्ये केली जात आहेत. यासारखे भंडारे भक्तांची सोय करत असल्याने भाविकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. कारण अशा प्रकारे शुद्ध आणि सात्विक अन्नासाठी कोणालाही धावपळ करावी लागत नाही.
मौनी अमावस्येनिमित्त जास्तीत जास्त भाविकांनी स्नान करावे यासाठी योगी सरकार पूर्ण तयारी करत आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान ६ कोटींहून अधिक भाविकांच्या गर्दीला तोंड देण्यासाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. रेल्वेने केलेल्या अतिरिक्त व्यवस्थेमुळे भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.