नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजप आणि एनडीए सरकार संविधान बदलणार या अफवांवर महाराष्ट्रातील दलित जनेतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी केले. मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आठवले म्हणाले की, एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यावर संविधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावर माथा टेकून शपथ घेतली. पंतप्रधानांची संविधानावर खरी श्रद्धा आहे. त्यामुळे संविधान बदलले जाईल, या निव्वळ अफवा आहेत.
काँग्रेस व इंडिया आघाडीने या अफवा पसरविल्या आहेत. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डाॅ. बाबासाहेब आबेंडकर यांचे स्मारक साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जागा मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून दलितांसाठी नवीन योजना आणण्याचा निर्धारही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.