नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक मणिपूरचा मुद्दा ताकदीने मांडणार आहेत. मणिपूर दौऱ्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोशल मीडिया 'एक्स'वर पोस्ट करून आपले लक्ष्य स्पष्ट केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि शांततेचे आवाहन करण्यासाठी मणिपूरला जाण्यास सांगितले आहे. हिंसाचारग्रस्त राज्यातील परिस्थितीमध्ये अजूनही सुधारणा होत नसल्याची खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली. हिंसाचार सुरू झाल्यानंतर त्यांनी तीन वेळा मणिपूरला भेट दिली आहे. ते म्हणाले की, आजही मणिपूरचे दोन तुकडे झाले आहेत. घरे जळत आहेत, निष्पापांचे जीव धोक्यात आले आहेत आणि हजारो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमध्ये शांततेची गरज हा मुद्दा संसदेत पूर्ण ताकदीने मांडू. यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडी सरकारवर दबाव आणण्याचे काम करेल. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही सोशल मीडियावरून एक वक्तव्य शेअर करून मणिपूरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरवर कधी तोंड उघडणार, असा सवाल त्यांनी केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, मणिपूर अस्थिर होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. येथील लोक हिंसाचार, खून, दंगली, विस्थापन यांचा सामना करत आहेत. हजारो निष्पाप लोकांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागत आहे. मणिपूरमध्ये शांततेसाठी सरकार प्रयत्न का करत नाही, असा सवाल त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख केला होता. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले होते. राज्यातील ‘सामाजिक तणावा’ची मुळे खूप खोलवर असल्याचे इतिहास सांगतो. ते म्हणाले की आतापर्यंत सुमारे 11 हजार एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. 1993 मध्ये जेव्हा राज्यात अशीच किंबहुना यापेक्षा अधिक हिंसक दंगल उसळली तेव्हा पाच वर्षे हिंसाचार सुरूच होता, असेही ते म्हणाले. राज्यात घडत असलेल्या घटनांवर राजकारण करू नये असे पंतप्रधान म्हणाले होते आणि मणिपूरमधील आगीत तेल टाकणाऱ्या लोकांना इशारा दिला होता.