पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा ताफ्यावर सोमवारी कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा ताफा आज सकाळी 10.30 च्या सुमारास इंफाळहून जिरीबाम जिल्ह्याकडे जात हाेता. राष्ट्रीय महामार्ग-37 वर ताफ्यावर सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला अहे.
जिरीबाम एकाची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने सरकारी कार्यालयांसह सुमारे 70 घरे जाळली हाेती. यानंतर शेकडो नागरिकांनी भागातून स्थालंतर केले आहे. मागील काही दिवसांपासून हिंसाचाराग्रस्त असणार्या जिरीबामला भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आज नियाेजित दौरा होता. या दाैर्याला जाताना मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याने मणिपूरमध्ये खळबळ माजली आहे.जखमी सुरक्षा कर्मचार्याला इंफाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
हिंसाचारानंतर मणिपूरच्या जिरीबाम भागातील सुमारे 600 लोक आता आसामच्या कछार जिल्ह्यात आश्रय घेत आहेत. काचार जिल्हा पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला आहे.
कचार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुमल महत्ता यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, मणीपूरच्या जिरीबाम भागात ४ दिवसांपूर्वी उसळलेल्या हिंसाचारानंतर आम्ही सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली आहे. आम्ही सुरक्षा कर्मचारी आणि विशेष कमांडो दल तैनात केले आहे. सर्व सीमावर्ती भागात गस्त वाढविण्यात आली आहे. जिरीबाम भागातील सुमारे 600 लोक आसामच्या दिशेने स्थलांतर केले आहे. त्यांनी काही नातेवाईकांच्या ठिकाणी आश्रय घेतला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आसाममध्ये शांततापूर्ण वातावरण आहे. स्थानिक आमदाराने शांतता समितीचीही बैठक बोलावली आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करू."