एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र : अ‍ॅड. आशिष शेलार 
राष्ट्रीय

Maha AI | एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी : अ‍ॅड. आशिष शेलार

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘महा एआय: बिल्डिंग सेफ, सिक्युअर अँड स्मार्ट गव्हर्नन्स’ सत्राचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : एआय ही केवळ तंत्रज्ञान क्रांती नसून, ती लोकशाही अधिक सशक्त करण्याची संधी आहे. सुरक्षित आणि स्मार्ट शासनाची गरज लक्षात घेता महाराष्ट्राने एआयचा प्रशासनात प्रभावी वापर केला असल्याचे सांगून महाराष्ट्र या तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र बनले असल्याचा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘महा एआय: बिल्डिंग सेफ, सिक्युअर अँड स्मार्ट गव्हर्नन्स’ या सत्रात ते बोलत होते. यावेळी माहिती व तंत्रज्ञान सचिव वीरेंद्र सिंग उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनाला मानवी चेहरा देण्याबरोबरच अधिक वेगवान, पारदर्शक केले असल्याचे सांगून शेलार यांनी महाराष्ट्र शासनाने केलेल्या डिजिटल प्रवासाची सविस्तर माहिती दिली. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या ‘महा क्राईम’ प्रकल्पामुळे गुन्हेगारी रोखणे, तपास प्रक्रिया गतिमान करणे आणि पारदर्शकता वाढविणे शक्य झाले. या प्रणालीचे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनीही कौतुक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात महा आयटी एक प्रगत ‘इंटेलिजेंट गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर’ उभारत असून हे क्लाउड-नेटिव्ह आणि एपीआय-आधारित मॉडेल आहे. या माध्यमातून स्मार्ट भरती प्रक्रिया, शहरी स्थानिक संस्थांसाठी एआय-आधारित मालमत्ता मॅपिंग,रिअल-टाइम नागरी डॅशबोर्ड,वाहतूक व पूर व्यवस्थापनासाठी तात्काळ डेटा विश्लेषण,हवामान आणि नागरी तक्रार निवारण प्रणाली हे उपक्रम राबविले जात असल्याचेही श्री शेलार यांनी यावेळी सांगितले. एआयचा वापर प्रशासनाला नागरिकांपासून दूर नेण्यासाठी नव्हे, तर अधिक संवेदनशील, अचूक आणि प्रतिसादक्षम करण्यासाठी केला जात असल्याचेही अ‍ॅड. शेलार यांनी स्पष्ट केले. 

वाढत्या सायबर धोक्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जसे मानवी शरीरासाठी आरोग्य आवश्यक आहे. तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य आहे. दिशाभूल करणारी माहिती आणि सायबर हल्ल्यां विरोधात मजबूत सायबर सुरक्षा आणि हायब्रिड पडताळणी यंत्रणा उभारण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. तरी जास्तीत जास्त जागतिक तंत्रज्ञान संस्थानी महाराष्ट्रासोबत भागीदारी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

या सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा  प्रवीण परदेशी, महाराष्ट्र सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, डॉ. अनुपम चटोपाध्याय, रणजित गोस्वामी, सुरेश सेठी, डॉ अमित कपूर, बिना सरकार, देवरुप धर यांनी तांत्रिक अनुभव मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT