LPG price hike file photo
राष्ट्रीय

LPG price hike: 'विश्वगुरू' स्वतःच्याच नागरिकांचे संरक्षण करू शकत नाही; LPG दरवाढीवरून विरोधकांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केल्यामुळे विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मोहन कारंडे

LPG price hike

नवी दिल्ली: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केल्यामुळे विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकल्याचा आरोप काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने सरकारवर केला आहे.

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा २९ ची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीतील १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९१३ वरून ९४२ रूपये झाली आहे. ही दरवाढ गेल्या तीन महिन्यांतील दुसरी वाढ असून, मार्च महिन्यातही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रूपयांची वाढ करण्यात आली होती. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम इंधनाच्या दरांवर होत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे.

'महागाई पुरुष मोदी' काँग्रेसचा निशाणा

दरवाढीनंतर काँग्रेसने पुन्हा एकदा 'महागाई पुरुष मोदी' म्हणत सरकारवर टीका केली. पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये लिहीले आहे की, "महागाई पुरुष मोदी यांनी पुन्हा एकदा महागाईचा बडगा उगारला आहे. आता घरगुती गॅस सिलिंडर २९ रुपयांनी महाग झाला आहे. मोदींचे सूत्र स्पष्ट आहे, जनतेकडून पैसे उकळायचे आणि आपल्या श्रीमंत मित्रांच्या तिजोऱ्या भरायच्या."

'महागाईने कंबरडे मोडले, सरकारने पोटावर लाथ मारली' : आप

आम आदमी पक्षानेही या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षाने म्हटले की, "अवघ्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडर महाग करण्यात आला आहे. महागाईमुळे जनता आधीच त्रस्त आहे, त्यात मोदी सरकारने त्यांच्या पोटावरच लाथ मारली आहे."

तृणमूल काँग्रेसची टीका; 'विश्वगुरू' दाव्यावर प्रश्नचिन्ह

तृणमूल काँग्रेसनेही केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. पक्षाने म्हटले 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात आणखी २९ रुपयांची वाढ. हेच भाजपचे मॉडेल आहे. जेव्हा जागतिक संकटे येतात, तेव्हा गरीब चिंतेत असतात आणि श्रीमंत मात्र भरभराट करत राहतात. 'विश्वगुरू' असल्याचा दावा करणारे सरकार आपल्याच नागरिकांना वारंवार बसणाऱ्या दरवाढीच्या धक्क्यांपासून वाचवू शकत नाही. भविष्याचा विचार करून कुटुंबांना दिलासा देण्याऐवजी, मोदी सरकार सर्वसामान्यांवरच आर्थिक बोजा टाकत आहे. श्रीमंतांसाठी ही किरकोळ गोष्ट असली तरी लाखो कुटुंबांसाठी मात्र घरगुती बजेटवर हा आणखी एक मोठा आघात आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT