पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election Exit Poll : भाजप पुन्हा सत्तेत येईल. त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा किंवा त्यापेक्षा काही जास्त जागा मिळतील, असे भाकीत सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे.
भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील भागात भाजपला मोठे नुकसान होणार नाही. ते या भागात फारशा जागा गमावतील असे वाटत नाही. दुसरीकडे देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात भाजपच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढू शकते. गेल्या काही वर्षांत भाजपने केरळ आणि तामिळनाडूमध्ये आपले मताधिक्य वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम निकालात पहायला मिळू शकतो, असे मत किशोर यांनी मांडले आहे.
मे महिन्यातही प्रशांत किशोर यांनी अशीच टिप्पणी केली होती आणि भाजप सरकार गेल्या वेळी जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच किंवा त्याहून अधिक जागा घेऊन सत्तेत परत येईल असे म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांत मतदान झाले असून आता 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, एक्झिट पोल समोर येण्यापूर्वी विरोधी पक्ष इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेल्या राजकीय पक्षांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत निवडणूक निकालानंतर या आघाडी पुढचे पाऊल काय असेल यावर चर्चा झाली. बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकेल.
काँग्रेसने एक्झिट पोलवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाचा कोणताही प्रवक्ता टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोलच्या निकालावरील चर्चेत सहभागी होताना दिसणार नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने त्यांचा पराभव निकालापूर्वीच स्वीकारल्याचे भाजपने म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने सुरुवातीपासून '400 पार'चा नारा दिला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला 300 जागा मिळतील असे दावे या आघाडीतील घटक पक्ष करत आहेत. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एक्झिट पोलचे निकाल पाहणे रंजक ठरणार आहे.