नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील हरदा आणि खरगोन जिल्ह्यांत वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. बैतूल येथे वीज पडल्याने एका कुटुंबातील चार जण जखमी झाले. बिहारमध्येही वीज पडण्याच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे पिकनिकसाठी गेलेले तीन जण पावसामुळे आलेल्या ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेले. अरुणाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलनाचा तडाखा कायम असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे देहरादूनमधील रिस्पना नदीला पूर आला आहे. गंगेच्या वाढत्या पाणी पातळीमुळे ऋषीकेशमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत राफ्टिंगवर बंदी घालण्यात आली आहे.
बुधवारी पंजाब आणि हरियाणात मान्सून दाखल झाला. त्यामुळे दिल्ली आणि राजस्थान वगळता देशातील जवळपास सर्व भागांत मान्सूनचे आगमन झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत दिल्ली, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्येही मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.