नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाच्या विविध भागांत पावसाने थैमान घातले आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे; तर राजस्थान आणि पंजाबमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
हरिद्वार-ऋषीकेश रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी काळी मंदिराजवळ दरड कोसळण्याची घटना घडली. डोंगरावरून मोठे दगड थेट रुळांवरील लोखंडी स्ट्रक्चरवर कोसळले, ज्यामुळे या स्ट्रक्चरचे मोठे नुकसान झाले आहे. दरडीचा मलबा रुळांवर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून, अनेक रेल्वेगाड्या थांबवल्या आहेत. सध्या रुळांवरून मलबा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. राजस्थानमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पंजाबमधील 23 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार गावांना पुराचा फटका बसला असून, यामुळे 3 लाख 84 हजार लोकसंख्या प्रभावित झाली आहे. राज्यात पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये 46 जणांचा मृत्यू झाला आहे. हथिनी कुंड बॅराजमधून पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील वृंदावनमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रसिद्ध राधा वल्लभ मंदिरात पाणी शिरले आहे; तर बांके बिहारी मंदिरापासून केवळ 100 मीटर अंतरावर पुराचे पाणी वाहत आहे. राज्यात आतापर्यंत 644.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, जो सरासरीच्या (641.4 मि.मी.) तुलनेत जास्त आहे.
हिमाचल प्रदेशात 2 राष्ट्रीय महामार्गांसह 824 रस्ते अद्यापही बंद आहेत. यापैकी बहुतेक रस्ते गेल्या 10 दिवसांपासून बंद आहेत. राज्यात या हंगामात सरासरीपेक्षा 45 टक्के जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 7 सप्टेंबर दरम्यान येथे सरासरी 652.1 मि.मी. पाऊस पडतो; मात्र यंदा सुमारे 948.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.