lalit modi sonia gandhi shashi tharoor  Pudhari
राष्ट्रीय

Lalit Modi Claims: 'सोनिया गांधी शशी थरुरला...', ललित मोदींचा खळबळजनक दावा, 16 वर्षांपूर्वीचे सिक्रेट केलं उघड

Lalit Modi Claims: आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी 2010 मधील कोची टस्कर्स वादावर मोठे दावे करत सोनिया गांधी आणि शशी थरूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Lalit Modi Makes Explosive Claims Over 2010 Kochi IPL Controversy: आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी 2010 मधील कोची टस्कर्स केरळ फ्रँचायझीशी संबंधित वादावर मोठा दावा करत पुन्हा एकदा राजकीय आणि क्रीडा वर्तुळात खळबळ उडवली आहे. एका मुलाखतीत त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वावर आणि खासदार शशी थरूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ललित मोदी यांनी दावा केला की, कोची टस्कर्स फ्रँचायझीच्या मालकी आणि आर्थिक व्यवहारांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारमधील अनेक प्रभावशाली नेते त्यांच्या विरोधात उभे राहिले होते. या प्रकरणात तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शशी थरूर यांच्या बचावासाठी पुढे आल्याचा आरोपही त्यांनी केला.

'माझ्यावर सर्व बाजूंनी दबाव आणला गेला'

मुलाखतीदरम्यान शशी थरूर यांना नेमके कोण पाठबळ देत होतं, असा प्रश्न विचारण्यात आला असता ललित मोदी यांनी थेट सोनिया गांधी यांचे नाव घेतले. ते म्हणाले, "माझ्यावर प्रत्येक बाजूने दबाव आणला जात होता. त्या काळात मला अहमद पटेल आणि प्रणब मुखर्जी यांचे फोन येत होते. राजीव शुक्लाही मला विविध सूचना देण्यासाठी संपर्क साधत होते."

कोची टस्कर्स वाद नेमका काय होता?

ललित मोदी यांच्या मते, कोची टस्कर्स फ्रँचायझीला आयपीएलमध्ये प्रवेश देताना सादर करण्यात आलेले आर्थिक मॉडेल संशयास्पद होते. या समूहाने तब्बल 350 दशलक्ष डॉलर्सची बोली लावून संघ विकत घेतला होता. मात्र, त्यामागील आर्थिक व्यवहार आणि मालकीची रचना पारदर्शक नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मोदी यांच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारात सुनंदा पुष्कर यांना कोणतीही गुंतवणूक न करता 25 टक्के इक्विटी दिली जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांनी या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले आणि अंतिम करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

शशी थरूर यांच्यावरही गंभीर आरोप

ललित मोदी यांनी दावा केला की, त्यांनी सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनी त्यांना फोन केला होता.

मोदींच्या आरोपानुसार, थरूर यांनी त्यांना सांगितले होते, "सुनंदाबद्दल जास्त प्रश्न विचारू नकोस. ती माझी जवळची मैत्रीण आहे. जर तू हा विषय पुढे नेलास, तर उद्या सकाळी तुझ्या घरी छापे पडतील."

पुन्हा चर्चेत आला जुना वाद

2010 मध्ये कोची टस्कर्स फ्रँचायझी आणि सुनंदा पुष्कर यांच्याशी संबंधित इक्विटी वादामुळे मोठा राजकीय गदारोळ झाला होता. त्यानंतर शशी थरूर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. आता तब्बल 16 वर्षांनंतर ललित मोदी यांनी केलेल्या नव्या दाव्यांमुळे हा जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मात्र, ललित मोदी यांच्या आरोपांवर शशी थरूर किंवा काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या दाव्यांमागील सत्य काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT