राजस्थानचे कृषी मंत्री किरोडी लाल मीणा यांनी बुधवारी ( दि.३) उशिरा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रघुकुल रिती सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई" अशी पोस्टही केली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर सात लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. या सात मतदारसंघांपैकी कोणतीही जागा गमावली तर ते मंत्रीपद सोडतील. अशी घोषणा त्यांनी केली होती.
राजस्थान मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर किरोडी लाल मीणा म्हणाले की, "गेल्या १०-१२ वर्षांपासून सक्रियपणे काम करूनही ज्या भागात माझा प्रभाव आहे त्या भागात मी माझ्या पक्षाला (भाजप) विजय मिळवून देऊ शकलो नाही. मी माझ्या पक्षाला विजय मिळवून देऊ शकलो नाही, तर मी राजीनामा देईन, आणि ते माझे नैतिक कर्तव्य आहे माझा पक्ष जिंकला नाही तर मी राजीनामा द्यावा, पण त्यांनी माझा राजीनामा फेटाळला आहे... मला कोणत्याही पदाची, ना मुख्यमंत्र्यांकडून, ना संघटनेकडून काही अपेक्षा आहे."
दौसा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथेही भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. मी आधीच जाहीर केले होते की, ज्या मतदाससंघांमध्ये विकास कामे केले आहेत तेथे पक्ष जिंकू शकला नाही तर मी राजीनामा देईन. दिलेला शब्द पाळण्यासाठी राजीनामा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी नाराजीतून राजीनामा दिलेला नाही. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी गेलो नाही कारण मी राजीनामा दिला होता. मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो होतो. राजीनामा स्वीकारणार नाही, असं त्यांनी आदरपूर्वक सांगितलं होतं, पाच वेळा आमदार आणि माजी राज्यसभा खासदार राहिलेल्या किरोडी मीना यांनी दौसा आणि सवाई माधोपूरमधून लोकसभेचे खासदार राहिले आहेत.