नवी दिल्ली: 'राहुल गांधी यांना मिस इंडियामध्येही आरक्षण हवे आहे. हा केवळ बाल बुद्धीचाच मुद्दा किंवा समस्या नाही तर त्याचा जयजयकार करणारेही त्यासाठी तितकेच जबाबदार आहेत,' अशी टीका किरेण रिजिजू यांनी राहुल गांधींवर केली. मिस इंडिया स्पर्धेत आजवर दलित-आदिवासी महिला नसल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. सदर व्हिडिओ शेअर करत किरेण रिजिजू यांनी टीका केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांनी शनिवारी एका ठिकाणी बोलताना वक्तव्य केले की, 'मी मिस इंडियाची यादी तपासली. यामध्ये दलित, आदिवासी किंवा ओबीसी समाजातील एकही महिला नव्हती.' यावर केंद्रीय मंत्री रिजेजु म्हणाले की, 'सरकार मिस इंडिया निवडत नाही. मनोरंजनासाठी बालबुद्धी ठीक राहू शकते, मात्र राहुल गांधी यांनी त्यांच्या फुटीरतावादी शब्दांनी मागासलेल्या समुदायांची खिल्ली उडवू नये. सरकार ऑलिम्पिकसाठी खेळाडू आणि चित्रपट कलाकारांची निवड करत नाही.'
रिजिजू म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे देखील स्पष्ट केले आहे की केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला सर्व उच्च सेवांच्या भरतीमध्ये आरक्षण बदलू देणार नाही. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील कॅबिनेट मंत्र्यांची विक्रमी संख्या आहे. मात्र राहुल गांधी यांना हे सर्व दिसत नाही,' असेही म्हणत रिजिजू यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला.