पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मुख्यमंत्रीपदी भाजपच्या रेखा गुप्ता यांनी आज (दि.२०) शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा आमदारही शपथबद्ध झाले. यामध्ये कपिल मिश्रा यांच्याही समावेश आहे. ते विधानसभा निवडणुकीत सलग दुसर्यांदा करावल नगर मतदारसंघातून विजयी झाले होते. आम आदमी पार्टीतून भाजपमध्ये आलेल्या कपिल मिश्रांविषयी जाणून घेवूया...
कपिल मिश्रा हे मूळचे उत्तर प्रदेशमधील देवारिया जिल्ह्यातील आहेत. त्यांना कुटुंबातील राजकीय वारसा लाभला. त्यांच्या आई आई अन्नपूर्णा मिश्रा भाजप नेत्या होत्या. त्या दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर होत्या. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे कपिल मिश्रा यांना २०१५ मध्ये आम आदमी पक्षाच्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जल आणि पर्यटन मंत्री बनवण्यात आले. पण केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले.
कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर २ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रारही केली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाने कपिल मिश्रा यांना प्रथम मंत्रिपदावरून काढून टाकले आणि नंतर पक्षातूनही काढून टाकले. २०१९ मध्ये कपिल मिश्रा आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले कपिल मिश्रा यांनी करावल नगर विधानसभेतून आम आदमी पक्षाचे मनोज कुमार त्यागी यांचा २३,३५५ मतांनी पराभव केला होता.