जोधपूर : वृत्तसंस्था
बालविवाहासारख्या प्रतिगामी प्रथेमुळे बालपण हरवलेल्या एका तरुणीने कायदेशीर लढाई जिंकून स्वतःचे आयुष्य पुन्हा मिळवले आहे. १२ व्या वर्षी लादलेला विवाह जोधपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून, या निर्णयामुळे अशा अनेक पीडित मुलींसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
२०१६ मध्ये खुशबू (नाव बदललेले आहे) अवघ्या १२ वर्षांची असताना तिचा विवाह विश्नोई समाजातील रितीरिवाजांनुसार लावून देण्यात आला होता. शाळेत जाणाऱ्या खुशबूला त्यावेळी लग्नाचा अर्थही कळत नव्हता.
मोठी झाल्यावर जेव्हा सासरच्या मंडळींनी एकत्र राहण्यासाठी दबाव आणला, तेव्हा तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्त्या कृती भारती (सारथी ट्रस्ट) यांच्या मदतीने खुशबूने १८ महिन्यांपूर्वी न्यायालयात धाव घेतली.
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश वरुण तलवार यांनी हा विवाह बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत शून्य (रद्द) घोषित केला. 'बालविवाह मुलांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करतो, ही प्रथा नष्ट करण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पाऊल उचलणे आवश्यक आहे,' असे महत्त्वपूर्ण निरीक्षण त्यांनी नोंदवले.
कुप्रथा आणि सामाजिक दबाव सामाजिक कार्यकर्त्या कृती भारती यांनी सांगितले की, हा विवाह मौसर (मृत्युभोज) या विधीदरम्यान झाला होता. समाजात मृत्यू झाल्यानंतर आयोजित केल्या जाणाऱ्या मेजवानीत अनेकदा लहान मुलांचे विवाह लावून दिले जातात.
सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी अनेक कुटुंबे कायद्यापेक्षा परंपरेला प्राधान्य देतात. खुशबूच्या सासरच्या मंडळींनी ती सज्ञान असताना लग्न झाल्याचा खोटा दावा केला होता, जो न्यायालयाने फेटाळून लावला.
नवे स्वप्न, नवी सुरुवात
सातवीत असताना शिक्षण सुटलेली खुशबू आता पुन्हा अभ्यासाकडे वळली आहे. तिने ओपन स्कूलिंगद्वारे माध्यमिक परीक्षेची तयारी सुरू केली आहे. 'शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी व्हावे, अशी माझ्या मोठ्या बहिणीचीही इच्छा आहे,' असे खुशबूने आत्मविश्वासाने सांगितले.