Jharkhand Panipuri case
रांची: झारखंडमधील बाजो गावामध्ये पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, सुमारे ६० जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. यातील २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचे खाताना केलेली एक चूक जीवावर बेतू शकते, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील बाजो गावात एका पाणीपुरी विक्रेत्याकडून अनेक मुलांनी पाणीपुरी खाल्ली. काही तासांतच या मुलांना त्रास होऊ लागला. त्यांच्यावर सुरुवातीला स्थानिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने सदर रुग्णालय आणि जवळच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान ७ वर्षाच्या रंजन कुमार या मुलाचा मृत्यू झाला.
गिरीडीहचे उपायुक्त रामनिवास यादव यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, पाणीपुरी खाल्याने एका बालकाचा मृत्यू झाला असून इतरांवर उपचार सुरू आहेत. उन्हाळ्यामुळे आधीच अतिसाराचे रुग्ण वाढत असताना या घटनेने गावात भीती पसरली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कित्येक दिवस साठवून ठेवलेले शिळे पदार्थ या घटनेला कारणीभूत असावेत."
पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी आणि इतर साहित्य फ्रिजशिवाय अनेक दिवस ठेवले गेले असावे. यामुळे त्यात बॅक्टेरिया (जीवाणू) तयार झाले असावेत, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. सध्या पाण्याचे नमुने आणि अन्नाचे अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत अन्न लवकर खराब होते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाताना खालील गोष्टी लक्षात ठेवा
नेहमी ताजे अन्न निवडा: पदार्थ नेहमी गरम आणि ताज्या स्वरूपात खाण्यास प्राधान्य द्या.
उघड्यावर ठेवलेल्या चटण्या किंवा पाणीपुरीचे पाणी पिणे टाळा.
पाणीपुरी, ज्यूस किंवा बर्फाचे गोळे यामध्ये वापरलेले पाणी दूषित असू शकते. शक्यतो सीलबंद बाटलीतील पाणीच वापरा.
ज्या गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये तुम्ही खात आहात, तिथली भांडी आणि परिसर स्वच्छ आहे का, याची खात्री करा.
उघड्यावर कापून ठेवलेली फळे किंवा कोशिंबीर लवकर दूषित होतात, ती खाणे टाळावे.
पदार्थाचा वास किंवा चव थोडी जरी वेगळी वाटली, तर तो पदार्थ त्वरित खाणे थांबवा.
उन्हाळ्यात निर्जलीकरणामुळे (Dehydration) परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
उलट्या, जुलाब किंवा पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.