Crime News
पटणा: जेवण वाढण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका माथेफिरू दिराने स्वतःच्याच वाहिनीची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर नराधमाने वाहिनीचे तुटलेले मुंडके घराजवळील एका वडाच्या झाडाला टांगून ठेवले. बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यातील परसा बिघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमादपूर गावात मंगळवारी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंशू देवी (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी दिर कुणाल कुमार (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या वेळी अंशू देवी घरात एकटीच होती, तर कुटुंबातील इतर सदस्य भातलावणीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्याच वेळी तिचा दिर कुणाल कुमार हा कामावरून घरी परतला. त्याने वाहिनीकडे जेवणाची मागणी केली. मात्र, जेवण वाढण्यास थोडा उशीर झाल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले आणि रागाच्या भरात कुणालने घरातील धारदार कुऱ्हाडीने अंशू देवीच्या मानेवर वार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. वहिनीचे डोके धडावेगळे केलं आणि घराबाहेर असलेल्या वडाच्या झाडाला टांगलं.
गावाबाहेरून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना वडाच्या झाडाला एका महिलेचे मुंडके टांगलेले दिसल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गावात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी कुणाल कुमारला गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. आरोपी कुणाल कुमारला अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, "प्रथमदर्शनी जेवण वाढण्यास उशीर झाल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे दिसत आहे. मात्र, यामागे आणखी काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारण आहे का, याचा सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात आहे."