नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हा राष्ट्रीय आणि राज्य सरकारच्या संस्थांमधील यंत्रणेतील त्रुटींचा परिपाक होता. या त्रुटींमुळे तरुणांमध्ये असंतोष असून त्यांना भविष्याची चिंता वाटत आहे, असा ठपका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने ठेवला आहे. सोबतच संघाने या अनुषंगाने दुरुस्तीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्लाही सरकारला दिला आहे.
विशाखापट्टणम येथे रा. स्व. संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. या बैठकीची माहिती देताना रा. स्व. संघ नेते मुकुंद सी. आर. म्हणाले, बैठकीत जंतर-मंतर आंदोलनाबाबत चर्चा झाली. या अनुषंगाने सरकारला आवश्यक पावले उचलण्याचा सल्लाही देण्यात आला. समाजानेही प्रयत्न करायला हवेत. सरकारने तरुणांच्या चिंता लक्षात घ्याव्यात. सरकारी यंत्रणेतील त्रुटींमुळे तरुण भविष्याबाबत साशंक आहेत. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. मात्र हिंसेने हे प्रश्न सुटणार नाहीत. प्रत्येक समस्येचे निवारण सकारात्मक उपक्रमांतूनच होईल. यासाठी समाज व सरकारने एकत्र येऊन जागरूकता वाढवावी. यंत्रणेतील त्रुटी संपविण्यासाठी प्रयत्न करावेत.
लोकसंख्येच्या असंतुलनातील बदल, तरुणांवर अमली पदार्थांचा वाढता प्रभाव, तरुणांना सकारात्मकतेने योग्य दिशेने कसे आणावे, त्यांच्या भविष्याबद्दल कशी चर्चा करावी, संघ प्रमुखांनी मांडलेली ‘पंच परिवर्तन’ संकल्पना, कौटुंबिक मूल्यांची जपणूक, संघ कार्याचा विस्तार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आदी विषयांवर विचारमंथन झाले.