पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करत दहशदवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून या महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दोन ते तीन दहशतवादी लष्करांच्या गणवेशात आले. व त्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील निसर्गरम्य परिसर असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. नैसर्गिक सौंदर्यासाठी 'मिनी-स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामुळे सुरक्षा दलांना तातडीने तैनात करण्यात आले आहे. दुर्गम, उंचावरील या ठिकाणी फक्त पायी किंवा घोड्यावरूनच पोहोचता येते, ज्यामुळे बचाव कार्याच अडथळे येत आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले आहे. तर स्थानिकांनी जखमींना कुरणातून खाली आणण्यासाठी घोड्यांचा वापर केला. किमान १२ पर्यटकांना पहलगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी गृहमंत्री शहा यांना तातडीने हल्ल्याच्या स्थळी जाण्यास सांगितले आहे.