पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केली. २३ ऑगस्ट, २०२४ ला या ऐतिहासिक घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहेत. या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाने भारत हा चंद्रावर उतरणारा तिसरा तर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर पाय ठेवणार पहिला देश ठरला. चांद्रयान-३ च्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-४ आणि चांद्रयान-५ मोहिमांसदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. ते आज (दि.२० ऑगस्ट) 'ANI' बोलत होते.
इस्रो अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आपल्याकडे चंद्रावर जाण्यासाठी अनेक मोहिमा आहेत. यामधील चांद्रयान-३ पूर्ण केले आहे. आता चांद्रयान-४ आणि ५ चे डिझाईन पूर्ण झाले असून, आम्ही सरकारची परवानगी मागत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. एस. सोमनाथ यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हटले आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांद्रयान आणि इतर मोहिमांमध्ये वापरण्यात येणारे रॉकेट. इस्रोकडे असलेले LVM3 असे रॉकेट आहे, ज्याची क्षमता 4-5 टन आहे. स्पर्धात्मक तुलनेत भारतीय LVM3 रॉकेटवर होणारा खर्च हा अधिक आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत रॉकेटवर होणारा खर्च कमी करण्याचे खरे आव्हान आहे, असेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले. म्हणूनच आम्ही दुसरे रॉकेट विकसित करत आहोत ज्याची किंमत LVM3 सारखी असेल, परंतु पेलोडच्या दुप्पट किंवा तिप्पट वजन ते पेलू शकेल. यासाठी आम्ही खाजगी-सार्वजनिक भागीदारी मॉडेलसाठी जात आहोत, असेही इस्रो अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.