IPS Krishna Kumar Bishnoi and Anshika Verma Wedding:
लखनौ: उत्तर प्रदेश पोलीस दलातील दोन कार्यक्षम आणि चर्चेत असलेले आयपीएस अधिकारी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. आपल्या कडक कार्यशैलीमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 'लेडी सिंघम' अंशिका वर्मा आणि संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांची ही जोडी सध्या संपूर्ण राज्याच्या पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. येत्या २९ मार्च रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.
बरेली येथे एसपी म्हणून कार्यरत असलेल्या अंशिका वर्मा यांना त्यांच्या तडाखेबंद निर्णयामुळे 'लेडी सिंघम' म्हणून ओळखले जाते. मूळच्या प्रयागराजच्या असलेल्या अंशिका यांनी आपल्या कार्यकाळात महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. २०२५ मध्ये त्यांनी बरेलीत 'वीरांगना युनिट' स्थापन केले, जे उत्तर प्रदेशातील पहिले विशेष महिला कमांडो पथक मानले जाते. या पथकातील महिलांना तायक्वांदो आणि दंगल नियंत्रणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. गुन्हेगारी नियंत्रण आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
दुसरीकडे, संभलचे पोलिस अधीक्षक कृष्णकुमार बिश्नोई हे त्यांच्या कडक प्रशासकीय शैलीसाठी देखील ओळखले जातात. २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी बिश्नोई हे मूळचे राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील आहेत. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश केडरमध्ये नियुक्त करण्यात आले. २०२४ मध्ये, त्यांना गोरखपूरहून संभल जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. संभलमध्ये आल्यानंतर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आणि प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याचे काम केले. नोव्हेंबर २०२४ मध्ये, संभल जिल्ह्यात जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे हिंसाचाराच्या घटना घडल्या. ही तणावाची परिस्थिती त्यांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने हाताळली होती.
या दोघांच्या प्रेमकथेची सुरुवात गोरखपूरमधून झाली. कृष्ण कुमार बिश्नोई हे २९ महिने गोरखपूरमध्ये एसपी म्हणून तैनात होते. याच काळात २०२१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी अंशिका वर्मा तिथे एएसपी म्हणून कार्यरत होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत असतानाच या दोन अधिकाऱ्यांची भेट झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
हे दोन्ही अधिकारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विश्वासातील मानले जातात. संभलसारख्या संवेदनशील जिल्ह्याची जबाबदारी बिश्नोई यांच्यावर सोपवण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले होते. विशेष म्हणजे, बिश्नोई यांना पदक प्रदान करताना त्यांच्या आई-वडिलांसोबतचा मुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.