नवी दिल्ली-पुढारी वृत्तसेवा : दडपशाहीचा प्रतिकार करण्याचा आणि धैर्याने स्वातंत्र्य मिळवण्याचा जवाहरलाल नेहरू यांचा भारतीयांसाठी सर्वात मोठा वारसा आहे. त्यांच्याकडून सत्य आणि धैर्य मला वारशाने मिळाले, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि. 19) शनिवारी केले. ‘एक्स’वर जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांच्याशी राहुल गांधींनी संवाद साधला आहे.
जवाहरलाल नेहरूंनी आम्हाला राजकारण शिकवले नाही. त्यांनी आम्हाला भीतीचा सामना करायला आणि सत्यासाठी उभे राहण्यास शिकवले, असेही राहुल गांधी म्हणाले. शोध घेणे, प्रश्न विचारणे, कुतूहल राहणे हे नेहरुंचे विचार आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. आपल्या कुटुंबाच्या आठवणींबद्दल बोलताना, राहुल गांधींनी त्यांच्या आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या साहसांच्या आणि आनंदाच्या कथा कशा सांगितल्या याची आठवण करून दिली. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी नेहमी व्यायाम करायचे आणि मी देखील करतो, असे ते म्हणाले. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची आठवण राहुल गांधींनी केली. या सर्वांनी भीतीशी मैत्री कशी करावी, हे शिकवले, असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, बिल गेट्स किंवा चेतराम मोचीसारख्या सामान्य माणसाशी समान भावनेने बोलतो. सर्वांना एकाच नजरेने पाहतो, असे ते म्हणाले. खरे नेतृत्व म्हणजे नियंत्रण मिळवणे नसून, करुणेने राहणे असते. आजच्या भारतात, जिथे सत्य गैरसोयीचे झाले आहे. मात्र, मी माझा मार्ग निवडला आहे. काहीही किंमत मोजावी लागली तरी, मी सत्याच्या बाजूने उभा राहीन, असे ते म्हणाले.