Health News Influenza deaths india
नवी दिल्ली: भारतात दरवर्षी फ्लू मुळे सुमारे १ लाख २० हजार लोकांचा मृत्यू होत असून, यामध्ये ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण तब्बल दोन-तृतीयांश (सुमारे ६६%) इतके आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संसर्गाचा एवढा मोठा धोका असूनही देशातील केवळ २ टक्क्यांपेक्षा कमी ज्येष्ठ नागरिकांनी फ्लूची लस घेतली आहे. 'जर्नल ऑफ द इंडियन अकॅडमी ऑफ जेरियाट्रिक्स' मध्ये प्रसिद्ध झालेल्या तज्ज्ञांच्या एका अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.
तज्ज्ञांनी 'लॉन्गिट्युडिनल एजिंग स्टडी इन इंडिया' मधील आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. या अभ्यासात असे दिसून आले की, वृद्ध व्यक्तींमधील लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी (३ टक्क्यांपेक्षा कमी) आहे. हे प्रमाण धनुर्वात-घटसर्प लसीकरणासाठी २.७५%, हिपॅटायटीस बी साठी १.८२%, फ्लूसाठी १.५९% आणि निमोनिया लसीकरणासाठी केवळ ०.७४% इतके होते.
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी सांगितले की, "भारतात प्रौढांमधील लसीकरणाची पातळी अत्यंत खालावलेली असून त्यात मोठ्या सुधारणेची गरज आहे. लसीकरण ही आरोग्यासाठी एक गुंतवणूक आहे, जी वृद्धत्वातील संसर्ग आणि रुग्णालयात भरती होण्याची वेळ टाळते. यासाठी अनेक संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे."
जयपूरच्या एसएमएस मेडिकल कॉलेजचे डॉ. सनी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली एम्स दिल्ली, जिपमेर पुद्दुचेरी आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर येथील तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताची लोकसंख्या झपाट्याने वृद्धत्वाकडे झुकत आहे. २०२२ च्या अंदाजानुसार, देशात ६० वर्षे व त्यावरील लोकांचे प्रमाण १०.५% होते, जे २०५० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप भारतात वृद्ध नागरिकांच्या लसीकरणासाठी कोणतीही ठोस राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.
अपुरी जागरूकता, लसींबद्दलची भीती, महागड्या लसी आणि दुर्गम भागात लसींची अनुपलब्धता यांमुळे लसीकरण रखडले आहे. तज्ज्ञांच्या समितीने ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्लू, निमोनिया, नागीण आणि धनुर्वाताच्या लसी नियमितपणे देण्याची शिफारस केली आहे. भारतासाठी स्वतंत्र आणि सुटसुटीत नियमावली तयार केल्यास वृद्धांमधील आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.