IndiGo flight
चेन्नई: इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानातील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अत्यंत कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. शुक्रवारी (दि. २१) संध्याकाळी, त्रिचीहून सिंगापूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उड्डाणानंतर काही वेळातच अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि विमान अडीच तास आकाशात घिरट्या घालत राहिले.
१२७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या विमानाला त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने परत यावे लागले. मात्र, लँडिंग करण्यापूर्वी हे विमान सुमारे अडीच तास आकाशात घिरट्या घालत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान संध्याकाळी ६:४० च्या सुमारास त्रिची विमानतळावरून उडाले. उड्डाणानंतर लगेचच वैमानिकांना विमानातील बिघाड लक्षात आला. त्यांनी त्वरित त्रिची एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. सुरक्षेच्या नियमांनुसार, आपत्कालीन लँडिंग करण्यापूर्वी विमानाचे वजन कमी करणे विशेषतः अतिरिक्त इंधन जाळून टाकणे आवश्यक असते. त्यामुळे, सुरक्षित लँडिंग करण्यासाठी वैमानिकांनी इंधनाचे वजन कमी करण्याच्या उद्देशाने विमानाला हवेतच घिरट्या घालण्यास सुरुवात केली.
त्रिची विमानतळाचे संचालक गोपालकृष्णन यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विमानतळ अधिकारी आणि एटीसी वैमानिकांच्या सतत संपर्कात होते. जमिनीवर आपत्कालीन सेवा आणि सुरक्षेची पूर्ण तयारी झाल्यानंतर, रात्री ९ च्या सुमारास विमान त्रिची विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. लँडिंगनंतर, संबंधित प्रवाशांसाठी त्वरित दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.
इंडिगोने तांत्रिक बिघाडाचे नेमके स्वरूप उघड केले नसले तरी, अलीकडच्या काळात इंडिगोच्या विमानाशी संबंधित ही दुसरी घटना आहे. याच्या आदल्याच दिवशी, म्हणजेच गुरुवारी (दि. २०), दिल्लीहून मंगळूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातही धावपट्टीवर असताना तांत्रिक बिघाड झाला होता.