नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने तिरंगा ध्वजाची ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैराह तेल टर्मिनलवर हल्ला झाला असतानाही भारतीय ध्वज डौलाने फडकवत ‘जग लाडकी’ हे कच्चे तेल वाहून नेणारे जहाज तिथून सुरक्षितपणे बाहेर पडले आहे. केंद्र सरकारने रविवारी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, भारताची ऊर्जा सुरक्षा आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
शनिवारी (14 मार्च) ज्यावेळी फुजैराह सिंगल पॉईंट मूरिंगवर हल्ला झाला, तेव्हा जग लाडकी हे जहाज तिथे कच्चे तेल भरण्याच्या प्रक्रियेत होते. या जहाजावर सुमारे 80 हजार 800 टन कच्चे तेल आहे. रविवारी सकाळी 10.30 वाजता (भारतीय वेळ) हे जहाज फुजैराहहून भारताच्या दिशेने रवाना झाले. जहाजावरील सर्व कर्मचारी आणि खलाशी सुरक्षित असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतीय मुत्सद्देगिरीचे यश
होर्मुजची सामुद्रधुनी सध्या युद्धाच्या छायेखाली असल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतही भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर पडणे, हे भारतीय मुत्सद्देगिरीचे मोठे यश मानले जात आहे. जग लाडकी हे युद्धक्षेत्रातून सुरक्षित बाहेर पडणारे चौथे भारतीय जहाज ठरले आहे.
इतर जहाजांचाही यशस्वी प्रवास
यापूर्वी शनिवारी शिवालिक आणि नंदा देवी ही एलपीजी वाहून नेणारी दोन भारतीय जहाजे सुमारे 92,712 टन गॅससह होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून सुखरूप बाहेर पडली आहेत. ही दोन्ही जहाजे त्या 24 जहाजांपैकी होती, जी युद्ध सुरू झाल्यापासून सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात अडकून पडली होती. याव्यतिरिक्त ओमानहून आफ्रिकेला पेट्रोल घेऊन जाणारे जहाजही शुक्रवारी सुरक्षितपणे युद्धक्षेत्रातून बाहेर पडले आहे. शिवालिक हे जहाज 16 मार्च रोजी मुंद्रा-गुजरात बंदरात पोहोचेल; नंदा देवी हे जहाज 17 मार्च रोजी कांडला बंदरात दाखल होईल.