न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : स्वतःच्याच लोकांवर बॉम्ब टाकणारा आणि पद्धतशीरपणे नरसंहार घडवून आणणारा देश आज आंतरराष्ट्रीय कायद्याच्या गोष्टी करत आहे, हे अत्यंत हास्यास्पद आणि ढोंगीपणाचे आहे, अशा कडक शब्दांत भारताने पाकिस्तानचा समाचार घेतला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने अफगाणिस्तानमधील निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानकडून होणार्या सीमापार हल्ल्यांचा उल्लेख करत भारताने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला.
सुरक्षा परिषदेत सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण या विषयावर वार्षिक खुली चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी नेहमीप्रमाणे भारताचा भाग असलेल्या जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या कुरापतीला भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वथनेनी यांनी चोख आणि सडेतोड उत्तर दिले. ज्या देशाचा इतिहास नरसंहाराने कलंकित आहे, त्यांनी भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलणे म्हणजे एक क्रूर विनोद आहे, असे पर्वथनेनी म्हणाले.
पाकिस्तानी अत्याचारांचा पर्दाफाश
भारताने संयुक्त राष्ट्राच्याच अहवालाचा हवाला देत पाकिस्तानचे वाभाडे काढले. मार्च महिन्यात रमजानच्या पवित्र महिन्यात पाकिस्तानने काबूलमधील उमीद व्यसनमुक्ती रुग्णालयावर हवाई हल्ला केला. रात्रीच्या नमाजनंतर झालेल्या या गुप्त हल्ल्यात 269 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर 122 जण जखमी झाले. एका रुग्णालयाला लक्ष्य करणे ही पाकिस्तानची अमानुषता दर्शवते.
‘ऑपरेशन सर्चलाईट’ आणि 1971 च्या नरसंहाराची आठवण
भारताने पाकिस्तानला त्यांच्या काळ्या इतिहासाची आठवण करून दिली. 1971 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगला देश) पाकिस्तानने चालवलेल्या ‘ऑपरेशन सर्चलाईट’चा उल्लेख करत, पाकिस्तानचा नरसंहाराचा इतिहास जुना असल्याचे पर्वथनेनी यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान नेहमीच आपल्या अंतर्गत अपयशांवरून लक्ष हटवण्यासाठी अशाप्रकारे सीमेपलीकडे हिंसेचा वापर करतो, असा आरोपही भारताने केला.