India pakistan news latest live updates : पाकिस्तानविरुद्धच्या कारवाया फक्त स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. भविष्य त्यांच्या वर्तनावर भारताची कारवाई अवलंबून असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी सोमवारी (दि. १२ मे) भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालन महासंचालकांदरम्यान (DGMOs) चर्चा झाली. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकही गोळी झाडली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी चर्चा झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. जाणून घेवूया लाईव्ह अपडेट...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरमध्ये पोहोचले. ऑपरेशन सिंदूर नंतरचा त्यांचा हा काश्मीरमधील पहिलाच दौरा आहे. राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थिती आणि सशस्त्र दलांच्या लढाऊ सज्जतेचा आढावा घेतला.
बदामी बाग छावणीत जवानांना संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "तुम्ही जे काही केले आहे त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. आमच्या पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुम्ही जे काही केले त्यामुळे संपूर्ण देशाची छाती अभिमानाने उंचावली आहे. जरी मी आता संरक्षण मंत्री असलो तरी, त्यापूर्वी मी पहिल्यांदा भारताचा नागरिक आहे. मी आज भारताचा नागरिक म्हणून तुमचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे."
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. येथील त्राल भागातील नादिर गावात गुरुवारी पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले.
जम्मूॅ दरम्यान, राजौरी जिल्ह्यातही हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहेत. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ दाट नागरी लोकसंख्या असलेली अनेक गावे आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून वारंवार होणार्या गोळीबारामुळे शेतीच्या कामावरही मोठा परिणाम झाला होता. आता शेतकरी शेतात परतले आहेत.
जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. चकमकीची सुरूवात कुलमाग येथे झाली होती. आज (दि. १५ मे) जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा येथील त्राल भागात आणखी एक चकमक सुरू झाली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक्सच्या माध्यमातून दिली आहे.
न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या भारतीय शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीबद्दल 'एएनआय'ला उत्तर देताना संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कार्यालय (यूएनओसीटी) चे अंडर-सेक्रेटरी-जनरल व्लादिमीर व्होरोन्कोव्ह आणि दहशतवादविरोधी समिती कार्यकारी संचालनालय (सीटीईडी) च्या सहाय्यक महासचिव नतालिया घेरमन यांनी भारत सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या दोघांनीही २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला, असेही प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.