नवी दिल्ली : भारत आपल्या अण्वस्त्रांचा साठा सातत्याने अधिक मजबूत व अत्याधुनिक बनवत आहे. अमेरिकेतील आघाडीची थिंक टँक 'फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टस्' (एफएएस)च्या अहवालानुसार, भारताकडे सध्या १९० अण्वस्त्रे आहेत. यापैकी १६० वर वॉरहेडस् अण्वस्त्रसक्षम लाँचर्ससाठी उपलब्ध आहेत, तर ३० वॉरहेडस् नव्या क्षेपणास्त्र प्रणालींसाठी तयार केली जात आहेत. भारतात उपलब्ध प्लुटोनियम व निर्माणाधीन शस्त्रास्त्र प्रणाली पाहता अण्वस्त्रसंख्या २२५ पर्यंत पोहोचू शकते, असेही अहवाल सांगतो.
सार्वजनिक स्रोत, सरकारी आकडेवारी व व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रांचे विश्लेषण करून 'एफएएस'ने हा अंदाज बांधला आहे. २०२६ च्या सुरुवातीपर्यंत भारताने सुमारे ७३० कि.ग्रॅ. शस्त्रास्त्र दर्जाचे प्लुटोनियम तयार केले आहे. एका अण्वस्त्रासाठी सरासरी चार कि.ग्रॅ. प्लुटोनियम लागते. यानुसार भारताकडे असलेल्या प्लुटोनियममधून १४० ते २२५ अण्वस्त्रे तयार केली जाऊ शकतात, असेही अहवालात म्हटले आहे.
‘अग्नी-५’मुळे मारक क्षमतेत मोठी वाढ
भारताच्या अण्वस्त्र आधुनिकीकरणात ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत या क्षेपणास्त्रासाठी 'एमआयआरव्ही' तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे 'एफएएस'ने नमूद केले. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्राद्वारे एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर अनेक अण्वस्त्रे डागणे शक्य होते. २०२४ नंतर मे २०२६ मध्येही या प्रणालीची यशस्वी चाचणी पार पडली असून हे क्षेपणास्त्र एका वेळी तीन वॉरहेडस् वाहून नेण्यास सक्षम ठरू शकते.