नवी दिल्ली ः युरोपियन युनियनशी ऐतिहासिक व्यापार करार केल्यामुळे भारतासाठी मत्स्य उत्पादने, कापड, कपडे, चामड्याच्या वस्तू, रत्ने-दागिने, प्लास्टिक, रसायने, रबर यासारख्या उत्पादनांवर शून्य टक्के शुल्क लागू होणार आहे. याद्वारे भारताला युरोपियन युनियनमधील देशांना वेगाने निर्यातवाढ करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
युरोपियन युनियनमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, फिनलँड, स्वीडनसह 27 देश आहेत. यापूर्वी कापड, कपडे, चामडे, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, रसायने, खेळणी आणि क्रीडा वस्तू यासारख्या कामगारकेंद्रित वस्तूंच्या निर्यातदारांना सरासरी 3.8 टक्क्यांहून अधिक शुल्क आकारले जात होते. आता हे शुल्क कमी होणार असल्यामुळे भारतीय निर्यातदारांना या कराराचा सर्वाधिक फायदा होईल. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, भारतीय कापड, कपडे, चामड्याच्या वस्तू, रत्ने-दागिने, रसायने, रबर यासारख्या वस्तू व उत्पादनांना युरोपमधील देशांत मोठी मागणी आहे.
वाहन आणि स्टील वगळता भारतातील 93 टक्क्यांहून अधिक वस्तूंना युरोपियन युनियनमध्ये शून्य टक्के शुल्क आकारले जाईल. तसेच, उर्वरित 6 टक्क्यांहून अधिक वस्तूंना शुल्क कपात आणि कोटाआधारित शुल्क सवलती दिल्या जाणार आहेत. युरोपियन युनियन कराराच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी 90 टक्के भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क रद्द करेल, तर तीन टक्के वस्तूंवरील शुल्क 7 वर्षांत टप्प्याटप्प्याने रद्द केले जाईल, असे या कराराचे स्वरूप आहे.