India on Pakistan airstrike
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अफगाणिस्तानच्या काबुलवर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा भारताने मंगळवारी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या दुःखद प्रसंगी भारत अफगाणिस्तानच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून सांगितले. भारताने या हल्ल्याचे वर्णन अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आणि प्रादेशिक शांतता व स्थिरतेसाठी असलेला धोका असे केले.
'ओमिद ॲडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल'वर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, काल रात्री काबुलमधील 'ओमिद ॲडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल'वर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा भारत निःसंदिग्ध शब्दांत निषेध करतो. ही हिंसाचाराची एक भ्याड आणि निर्घृण कृती आहे. या हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिकांचा बळी गेला आहे, ज्याला कोणत्याही प्रकारे लष्करी कारवाई म्हणून समर्थित करता येणार नाही, असे मंत्रालयाने म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तान आता या "नरसंहाराला लष्करी कारवाईचे स्वरूप देण्याचा" प्रयत्न करत आहे.
"या घटनेतून पाकिस्तानच्या बेपर्वा वर्तनाची सातत्यपूर्ण पद्धत आणि आपल्या सीमेपलीकडे हिंसक कृत्यांचा वाढता आधार घेऊन, आपल्या अंतर्गत अपयशांचे खापर इतरांवर फोडण्याचे त्याचे वारंवारचे प्रयत्न दिसून येतात," असे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले.
आंतरराष्ट्रीय समुदायाने या गुन्हेगारी कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना जाब विचारला पाहिजे आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना पाकिस्तानकडून होणारे "हेतूपूर्वक लक्ष्य करणे" कोणत्याही विलंबाशिवाय थांबेल, याची खात्री केली पाहिजे. "हा हल्ला रमजानच्या पवित्र महिन्यात करण्यात आला, जो जगभरातील मुस्लिम समुदायांमध्ये शांतता, चिंतन आणि दयाभावनेचा काळ मानला जातो; यामुळे ही घटना अधिकच निषेधार्ह ठरते," असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
"कोणताही धर्म, कोणताही कायदा आणि कोणतेही नैतिक मूल्य एखाद्या रुग्णालयाला आणि त्यातील रुग्णांना हेतुपुरस्सर लक्ष्य करण्याचे समर्थन करू शकत नाही. आम्ही पीडित कुटुंबांप्रती मनापासूनच्या संवेदना व्यक्त करतो, असे नमूद करत जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा अशी सदिच्छाही परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. या "दुःखद प्रसंगी" भारत अफगाणिस्तानच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. "आम्ही अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी असलेला आमचा ठाम पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त करतो," असेही भारताने म्हटले.