पुढारी ऑनलाईन डेस्क: विरोधी पक्ष नेत्यांच्या इंडिया आघाडीने आज (दि, ६ ऑगस्ट) जीएसटी मागे घेण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी सरकारविरोधात संसद परिसरात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
संसद परिसरात विरोधी पक्ष नेत्यांच्या इंडिया आघाडीने आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील जीएसटी मागे घेण्याच्या मागणीसाठी सरकारविरोधात संसदेच्या मकरद्वार बाहेर निदर्शने केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह प्रमुख विरोधी पक्षातील नेते देखील उपस्थित होते.
मोदी सरकारने आपल्या 'रिकव्हरी बजेट'मध्ये आरोग्य आणि जीवन विमा सेवांवरील जीएसटी वाढवला आहे. त्यामुळे या सुविधांसाठी जनतेला इथून पुढे अधिक खर्च करावा लागणार आहे. मोदी सरकारच्या या वसुलीविरोधात भारत आघाडीच्या नेत्यांनी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. या संदर्भातील माहिती प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत दिली आहे.
गब्बर सिंग टॅक्स कोणालाही सोडत नाही, अगदी मृत्यूशय्येवर असलेल्यांनाही नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रमुख नेते के.सी.वेणुगोपाल यांनी सत्ताधारी सरकारवर केली आहे. त्यांनी यावर बोलताना पुढे म्हटले आहे की, आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवर 18% GST लादणे अमानवी आहे आणि ते ताबडतोब काढून टाकले पाहिजे. या जीएसटीविरोधात 'इंडिया आघाडी'च्या खासदारांनी संसदेच्या संकुलात निदर्शने केली आहेत.